August 5, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

श्री शिवाजी विद्यामंदिर, औंध येथे २००३-२००४ च्या दहावी वर्गाचा २१ वर्षांनी स्नेहमेळावा!

औंध :

श्री शिवाजी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, औंध गाव, पुणे येथे २००३-२००४ साली दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी २१ वर्षांनी एकत्र येत एक अविस्मरणीय स्नेहमेळावा साजरा केला. या प्रसंगी शाळेतील त्यांचे आदर्श प्राध्यापक, शिक्षक, काका आणि लॅबमधील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

 

या स्नेहमेळाव्याचा आनंद उपस्थितांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर शिक्षकांनी नेहमीप्रमाणे लाडकी छडी मारून विद्यार्थ्यांचे स्वागत केले, ज्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. विद्यार्थ्यांनीही शिक्षकांचे पुष्पवृष्टी करून आदराने स्वागत केले. शाळेतील सध्याच्या विद्यार्थ्यांनी केलेली सुंदर सजावट पाहून शिक्षकांनाही विशेष आनंद झाला.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत, प्रार्थना आणि सर्व महापुरुषांना मानवंदना देऊन झाली. त्यानंतर शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी आपापल्या शाळेतील आठवणी आणि अनुभव सांगितले. अनेक विद्यार्थी आज शासन, माहिती तंत्रज्ञान (IT) आणि उद्योजक अशा विविध क्षेत्रांमध्ये उच्च पदांवर कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेतील संस्कारांना आणि शिक्षकांना दिले, तसेच शाळेतील काही अविस्मरणीय क्षण पुन्हा अनुभवले. ‘हीच माझी शाळा’ म्हणत सर्वांनी आपल्या प्रिय विद्यालयाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

हा स्नेहमेळावा म्हणजे केवळ एक पुनर्भेट नव्हती, तर गुरु-शिष्यांच्या अतूट नात्याचा आणि शाळेने दिलेल्या अमूल्य संस्कारांचा तो एक सुंदर सोहळा होता.

 

You may have missed