September 17, 2024

Samrajya Ladha

समाजाने विज्ञानाची सृष्टी घेतली पण दृष्टी घेतली नाही : ॲड.मुक्ता दाभोळकर

औंध :

समाजाचा विकास हा त्याच्या विवेकी मूल्याच्या प्रमाणावर ठरत असतो. समाज निकोप होण्यासाठी प्रत्येकाने विवेकी मूल्य जपली पाहिजेत व वैज्ञानिक दृष्टी जोपासली पाहिजे असे उदगार माननीय adv मुक्ता दाभोलकर यांनी काढले. रयत शिक्षण संस्थेच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय औंध येथील Rational Thinking Cell येथील उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.

सध्याच्या समाज हा विविध कारणांनी व्यसनाधीन होत आहे. त्यामुळे विवेकी विचाराची आस धरणे ही महत्वाची बाब आहे. Rational Thinking Cell हा युवकांच्या मध्ये विवेकी विचारांची पेरणी ही वाचन, चिंतन आणि वैज्ञानिक दृष्टी कोन जोपासून चालविण्याचा विचार त्यांनी व्यक्त केला. तसेच वैचारिक जडण घडण ही माणूस घडण्याच्या मार्गातील महत्वाचा भाग आहे. त्यामुळे Rational Thinking Cell ह्यामध्ये महत्वाची भूमिका बजावेल. यावेळी त्यांनी विद्यार्थ्याना या विवेकी विचारांच्या चळवळी मध्ये सामील होण्याचे आवाहन केले.

मानव मानसिक दृष्ट्या दुसऱ्याच्या आधीन कसे होतो याची काही उदाहरणे विद्यार्थ्यांसमोर प्रयोगाच्या माध्यमातून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सामाजिक कार्यकर्ते मिलिंद देशमुख यांनी केले. तसेच परमेश्वर हावी होत असलेल्या या काळात मूर्ती पूजक आणि भंजकाच्या माध्यमातून व्होट बँक, नोट बँक तयार केली जात आहे. अशा वेळेस विवेकी विचारांची गरज तर आहेच पण सर्वात मोठे आव्हान ती जनमानसात रुजवणे हेही आहे, हे आवर्जून सांगितले.

एमएसएफडीचे समन्वयक डॉ. हर्षदा बाब्रेकर यांच्या हस्ते बिन पाण्याचा दिवा प्रज्वलित करून त्यामागचे वैज्ञानिक कारण स्पष्ट करून Rational Thinking Cell चे उद्घाटन केले.

युवक वर्गाने विवेकी विचारांचा वसा अंगी बाणवला पाहिजे व स्वतःचा तसेच समाज बांधणी मध्ये सहभागी झाले पाहिजे, असे प्राचार्य डॉक्टर अरुण आंधळे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे नियोजन डॉ सविता पाटील यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा सायली गोसावी यांनी केले व आभार प्रा. डॉ प्रभंजन चव्हाण यांनी व्यक्त केले. कार्यक्रमासाठी डॉ. रमेश रणदिवे, डॉ. राजेंद्र रासकर, डॉ. तानाजी हातेकर, डॉ. देवकी राठोड, प्रा. गौरव जाधव उपस्थित होते.