September 8, 2024

Samrajya Ladha

छत्रपती शिवाजी महाराज नगर विधानसभा मतदार संघात पुलाची वाडी येथे दुर्दैवी घटनेमध्ये मृत्यू झालेल्या तरुणांच्या कुटुंबाला तसेच शासनाने तातडीने मदत करावी दत्ता बहिरट यांची मागणी..

पुणे :

छत्रपती शिवाजी महाराज नगर विधानसभा मतदार संघात पुलाची वाडी येथे पुराच्या पाण्यात विजेचा शॉक लागून 3 तरुणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या या घटनेतील बाधितांच्या कुटुंबीयांना तातडीने शासनाकडून मदत करण्यात यावी अशी मागणी माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 

डेक्कन नदीपात्रातील अंडा भुर्जीची गाडी दुसऱ्या जागी हलवत असताना शॉक लागून तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आज पहाटे तीन वाजताच्या सुमारास भिडे ब्रिज परिसरातील झेड ब्रिज खालील नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढला होता. हे तीन तरुण अंडा भुर्जी स्टॉल सुरक्षित ठिकाणी हलवण्याकरता गेले होते. तेव्हा त्यांना विजेचा शॉक लागला. त्यांना सह्याद्री हॉस्पिटल येथे दाखल केले होते. सदर तरुणांना उपचारांती डॉक्टरांनी पाहटे पाच वाजताच्या दरम्यान मृत घोषित केले आहे.

अभिषेक अजय घाणेकर (वय वर्ष 25) आणि आकाश विनायक माने (वय वर्ष 21) राहणार पूलाची वाडी डेक्कन , शिवा जिदबहादुर परिहार (वय वर्ष १८ )नेपाळी कामगार अशी मृत तरुणांची नावे आहेत. महावितरणाने घटनेची पुष्टी केली आहे. पोलीस, महापालिका अधिकारीही घटनास्थळी गेले होते.

मृत तरुणांच्या नातेवाईकांना शासकीय निकषानुसार रोख शासकीय मदत करण्यात यावी तसेच कुटुंबातील कर्ते युवक गमावले असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावा म्हणून कुटुंबातील एका व्यक्तीस सरकारी नोकरी देण्यात यावी. पुणे शहरात अचानक उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे नदी किनारी असलेल्या पुलाची वाडी, पाटील इस्टेट, मुळा रोड, भैय्या वाडी , खडकी, बोपोडी येथील वसाहतींमध्ये शेकडो घरांमध्ये नदीचे पाणी शिरले आणि नागरिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. या सर्व नुकसान भरपाईचे प्रशासन स्तरावरून तातडीने पंचनामे करून नागरिकांना मदत करावी अशी मागणी दत्ता बहिरट यांनी केले आहे.