March 21, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

लोकसेवेसाठी स्व. बापट साहेबांचा कायम आग्रह असायचा : गौरव बापट

औंध :

स्व.बापट साहेबांनी राजकीय पदांचा स्वत:साठी अथवा आम्हा कुटुंबियांसाठी कधीच वापर केला नाही. त्यांच्या राजकीय पदांमुळे जनतेचा फायदा कसा अधिक होईल यासाठी त्यांनी प्रयत्न केले. लोकसेवेसाठी त्यांचा कायम आग्रह होता. म्हणूनच खऱ्या अर्थाने ते लोकनेते होते. असे प्रतिपादन गौरव बापट यांनी केले.

स्व.खासदार गिरीश बापट यांच्या जयंती निमित्त तसेच पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने यांच्या वतीने सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत औंध, बोपोडी येथील नागरिकांसाठी आयुष्यमान भारत, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना तसेच आयुष्यमान भारत हेल्थ कार्डचे (आभा कार्ड ) शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन गौरव बापट यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी ते बोलत होते.

कॅटलिस्ट फाऊन्डेशनच्या सचिव लक्ष्मीकांता माने, खडकी युवा मोर्चा अध्यक्ष अजित पवार, महेंद्र कदम, बुद्धभूषण मंडळ बोपोडीचे अध्यक्ष शशिकांत भालेराव, सुभाष गजरमल, संतोष भिसे, नितीन गायकवाड, संदीप चौरे, योगेश केरकर, पंकज सोमावार, शाम भालेराव, वामन यादव,अनिल माने, प्रतिक वाघमारे, ऋषभ काळे आदींच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी गौरव बापट म्हणाले, लोकांची कामे करत असताना बापट साहेबांनी कधी जात, धर्म, अथवा पक्ष पहिला नाही. त्यामुळेच बाबांचे प्रत्येक पक्षात मित्र होते. या मैत्रीचा वापर सुद्धा त्यांनी जनसामान्यांसाठी केला. अटल बिहारी वाजपेयीजी, लालकृष्ण अडवाणीजी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदीजींप्रमाणे यांच्या विचारांना नेहमी आदर्श मानून त्यांनी ‘लक्ष अंत्योदय’ ठेऊन नेहमी काम केले.

स्व.बापट साहेबांच्या स्मृती जागवताना सुनील माने म्हणाले, बापट साहेब माझा आदर्श होते. फक्त माझेच नाही तर एक आदर्श राजकारणी कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे गिरीश बापट असे म्हणता येईल. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असे त्यांचे वर्णन करता येईल. आमदार असतानाही त्यांनी ‘टेल्को’ मध्ये नोकरी केली होती. सेवा निवृत्ती नंतर त्यांनी ‘टेल्को’ ची नोकरी थांबवली. राजकीय पदे येत जात असतात मात्र कार्यकर्ता हे पद कायम असते असे ते नेहमी म्हणत. लोकोपयोगी कार्यक्रम करण्यासाठी ते कायम आग्रही होते. शेवटच्या श्वासापर्यंत ते लोकांच्या हिताची कामे करत राहिले. म्हणूनच त्यांच्या जयंती दिनी लोकहिताची कामे करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या या उद्देशाने आज आम्ही हे शिबीर आयोजित केले आहे.

आज शिबिराच्या पहिल्या दिवशी १२५ लोकांचे आभा कार्ड काढण्यात आले. १७ सप्टेंबर पर्यंत हे शिबीर चालणार असून जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यावा. असे आवाहनही माने यांनी यावेळी केले.