February 4, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर-बालेवाडीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिवम बालवडकर यांचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना निवेदन..

बाणेर :

बाणेर आणि बालेवाडी परिसरात नागरिकांना भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे पुणे शहर उपाध्यक्ष शिवम बालवडकर यांनी या गंभीर समस्येकडे केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांचे लक्ष वेधले आहे.

याबाबत बालवडकर यांनी खासदार मोहोळ यांना पत्र दिले असून, बालेवाडीतील 18 मीटर आणि 24 मीटर रुंदीचे अपूर्ण रस्ते तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे. हे रस्ते अपूर्ण असल्यामुळे परिसरातील नागरिकांना दररोज ठिकठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो, ज्यामुळे त्यांचा वेळ आणि ऊर्जा दोन्ही वाया जातात.

खासदार मुरलीधर मोहोळ यांनी या पत्राची दखल घेतली असून, या प्रकरणी तातडीने लक्ष घालून लवकरच योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. मोहोळ यांच्या आश्वासनामुळे बाणेर-बालेवाडी परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला असून, आता या अपूर्ण रस्त्यांचे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन वाहतूक कोंडीतून सुटका मिळेल अशी अपेक्षा आहे.

या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघाल्यास परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होईल आणि वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत होईल.