July 21, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

*ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून आयोजित शिबिरात उमटले असंख्य मातांच्या डोळ्यांत आनंदाश्रू* *सखी-सुखदा फाउंडेशनच्या मोफत श्रवण तपासणी शिबिरास कोथरुडमधील मातांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*

कोथरुड :

प्रत्येक आई आपल्या बाळाचा पहिला रडण्याचा आवाज ऐकते, पहिल्या हसण्यावर भारावून जाते आणि “आई” हा पहिला शब्द ऐकण्याचे स्वप्न मनात जपून ठेवते. पण जर हेच बाळ नीट ऐकत नसेल तर? हा विचारच कोणत्याही आईच्या काळजाचा ठोका चुकवणारा असतो.

अनेक रुग्णालयांमध्ये प्रसूतीनंतर नवजात बाळ निरोगी असल्याची खात्री करण्यासाठी काही महत्त्वाच्या तपासण्या करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, या तपासण्यांचा खर्च परवडत नसल्याने अनेक कुटुंबांकडून त्या पुढे ढकलल्या जातात किंवा टाळल्या जातात. कोणत्याही आर्थिक अडचणीमुळे एखाद्या बालकाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये; आणि प्रत्येक पालकाला आपल्या बाळाच्या आरोग्याची खात्री मिळावी, या संवेदनशील भावनेतून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा कोथरुडचे आमदार ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने आणि सखी-सुखदा फाउंडेशनच्या संचालिका स्मिता पाटील यांच्या माध्यमातून शनिवारी नवजात व लहान बाळांसाठी मोफत श्रवण तपासणी व तज्ज्ञ मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जवळपास १०० बालकांची यावेळी तपासणी करण्यात आली.

शिबिरात सहभागी झालेल्या अनेक मातांनी आपल्या बाळाच्या तपासणीचा अहवाल पाहिल्यानंतर सुटकेचा नि:श्वास टाकला, तर काहींच्या डोळ्यांत नकळत आनंदाश्रू दाटून आले. अनेक मातांच्या ओठांवर एकच भावना उमटली—“आई… खरंच माझं बाळ ऐकतंय!” या शिबिरामुळे अनेक पालकांच्या मनातील अनामिक भीती दूर झाली, तर काहींना पुढील उपचारांची योग्य दिशा मिळाली.

“श्रवणदोषाचे वेळेत निदान झाल्यास उपचार आणि पुनर्वसन लवकर सुरू करता येते. त्यामुळे बाळाच्या बोलण्याच्या, भाषेच्या आणि बौद्धिक विकासाला योग्य दिशा मिळते. वेळेत केलेली श्रवण तपासणी अनेक मुलांचे भविष्य बदलू शकते,” असे डॉ. संवाद स्पीच-हिअरिंग क्लिनिक अँड रिसर्च फाउंडेशनच्या संचालिका श्रीमती शिल्पा हुजूरबाजार, प्राजक्ता हुजूरबाजार, यश हुजूरबाजार यांनी सांगितले.

समाजातील दुर्बल घटकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याच्या या संवेदनशील उपक्रमासाठी ना. चंद्रकांतदादा पाटील आणि सखी-सुखदा फाउंडेशनच्या संचालिका स्मिता पाटील यांच्याप्रती उपस्थित मातांनी मनापासून कृतज्ञता व्यक्त केली. “राजकारणापलीकडे जाऊन नवजात बाळांच्या निरोगी भविष्यासाठी असा विचार करणारे उपक्रम समाजाला आश्वस्त करतात,” अशा भावना अनेक पालकांनी यावेळी व्यक्त केल्या.

 

You may have missed