बाणेर :
पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे साहेब यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित घरगुती सजावट स्पर्धेचा शुभारंभ सोहळा आज मोठ्या दिमाखात संपन्न झाला. गेल्या १८ वर्षांपासून बाणेर-बालेवाडी परिसरात घरगुती गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून यंदाचे या उपक्रमाचे १९ वे वर्ष आहे.
२००६ साली १६७ स्पर्धकांच्या सहभागातून सुरू झालेला घरगुती गौर सजावट स्पर्धेचा हा उपक्रम आज हजारो कुटुंबांच्या आनंदात भर घालणारा आणि बाणेर, बालेवाडी, सूस व म्हाळुंगेमधील नागरिकांसाठी अभिमानाची एक परंपरा ठरलेला आहे. दरवर्षी या स्पर्धेला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हेच या उपक्रमाच्या यशाचे खऱ्या अर्थाने प्रमाण आहे. गेल्या वर्षी तब्बल १३५० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवून आपल्या कलात्मकतेचा अद्वितीय ठसा उमटवला. यंदाही या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद लाभला आहे. स्पर्धेचा शुभारंभ बाणेर येथील रहिवासी शितल रामदास बालवडकर यांच्या घरी आयोजित गौरी उत्सवाला भेट देऊन करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष समीर चांदेरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर उपाध्यक्ष राहुल बालवडकर, सरला बाबुराव चांदेरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
नागरिकांकडून आपआपल्या घरी अतिशय सुरेख पध्दतीने गौरींची सजावट करण्यात आली आहे. या घरगुती गौरी सजावट स्पर्धेचा उद्देश केवळ सजावटीपुरता मर्यादित नाही. संस्कृती टिकवून ठेवणे, परंपरेला नव्या पिढीत रुजवणे आणि घराघरात सृजनशीलतेला प्रोत्साहन देणे हेच या उपक्रमामागचे ध्येय आहे. या निमित्ताने बाणेर, बालेवाडी, सूस आणि म्हाळुंगे परिसरातील नागरिकांमध्ये केवळ सृजनशीलतेचीच नव्हे तर सामाजिक सलोख्याची भावना आणि एकत्र येण्याचा आनंद वाढीस लागत असल्याचे पाहायला मिळत आहे.
“गेल्या १९ वर्षांपासून गणेशोत्सवानिमित्त आयोजित घरगुती सजावट स्पर्धेच्या उपक्रमाला सातत्याने मिळणारा पाठिंबा, सहभाग आणि प्रेम हेच आमच्या कामाची खरी ताकद आहे. प्रत्येक वर्षीचा वाढता उत्साह हीच या परंपरेच्या लोकप्रियतेची साक्ष आहे.”
–बाबुराव चांदेरे
मा.अध्यक्ष-स्थायी समिती पुणे महानगरपालिका



More Stories
योगीराज पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप….
पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, सूस येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा भावस्पर्शी निरोपसमारंभ सोहळा संपन्न.
“शिक्षणाबरोबरच मूल्यसंस्कार घडले तरच विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होते” – मा. आमदार शरद ढमाले