February 4, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर-बालेवाडीचा एवढा विकास कोणी केला ? – जयेश मुरकुटे यांचा सत्ताधाऱ्यांना उपरोधिक सवाल

बाणेर :

बाणेर-बालेवाडी परिसरात सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी केलेल्या विकासाच्या दाव्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे कोथरूड विधानसभा कार्याध्यक्ष  जयेश मुरकुटे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विकासाच्या मोठमोठ्या घोषणा केवळ कागदावरच राहिल्या असून, आजही नागरिक मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करत असल्याचा उपरोधिक सवाल मुरकुटे यांनी केला आहे.

मुरकुटे यांनी निदर्शनास आणले की, बाणेर-बालेवाडी परिसर आजही रस्त्यांवरील खड्डे, पावसाचे साचलेले पाणी, प्रचंड वाहतूक कोंडी, ड्रेनेजची दुरवस्था, तुटलेली चेंबर्स, धोकादायक विद्युत पोल आणि वाकलेली झाडे यांसारख्या अनेक समस्यांनी त्रस्त आहे. “स्मार्ट सिटीच्या नावाखाली विकासाच्या गप्पा सुरू आहेत, पण बाणेर-बालेवाडीतील जनतेला याचा कोणताही लाभ मिळत नाही,” असे ते म्हणाले.

“विकास केला म्हणणारे आज सत्तेत आहेत, मग नागरिकांना आजही हे हाल का सहन करावे लागत आहेत? याचा कोणी जाब विचारत का नाही?” असा थेट सवाल करत मुरकुटे यांनी सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

या भागातील नागरिकांनी एकत्र येऊन आपल्या समस्यांवर आवाज उठवावा आणि आपल्या हक्कांसाठी संघर्ष करावा, असे आवाहनही मुरकुटे यांनी केले आहे.