October 18, 2024

Samrajya Ladha

कोथरूडमध्ये अमोल बालवडकर यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन -जाहीर मेळाव्यातून चंद्रकांत पाटील यांच्याविरुद्ध बालवडकर यांनी दंड थोपटले

-नागरिकांनाच केले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री; व्यासपीठावरील सन्मानाने नागरिक भारावले

कोथरूड :

ज्यांच्यासाठी तन मन धन लावून काम केले. पाच वर्ष ज्यांच्या पुढे मागे राहिलो. त्यांच्यासाठी रात्रीचा दिवस केला. पण या नेत्यांना जेव्हा एखादा कार्यकर्ता आमदारकी लढवण्यासाठी इच्छुक आहे असे कळते. तेव्हा हेच नेते आपल्याला धमकी देतात. तिकीट तुम्हालाच मिळणार आहे. निदान एखादा कार्यकर्ता इच्छुक आहे. तेवढे तरी राहू द्या. असे म्हणण्या इतपत या नेत्यांचे मन मोठे नसेल तर मग जनता जनार्दनाचे आशीर्वाद पाठीशी असताना कशाची भीती मनात ठेवायची असे म्हणत माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात कोथरूडमध्ये दंड थोपटले. 40 हजारहून अधिक नागरिकांच्या उपस्थितीत मेळाव्यात जोरदार शक्ती प्रदर्शन देखील केले.

कोथरूड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी रविवारी (दि.6) जनआशिर्वाद मेळावा आणि दिवाळी सरंजाम वाटप कार्यक्रम घेण्यात आला. बालेवाडी येथील हायस्ट्रीट मैदानावर संपन्न झालेल्या या कार्यक्रमात तब्बल 40 हजार हून अधिक नागरिकांना दिवाळीनिमित्त सरंजाम वाटप करण्यात आले.

या जाहीर मेळाव्यात बालवडकर म्हणाले, नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली. या लोकसभा निवडणुकीमध्ये मी पक्षाचे काम करण्यासाठी नागरिकांमध्ये जात होतो. त्यावेळी नागरिकांनी माझ्याकडे एक मागणी केली की, आता आपल्याला पुढे गेले पाहिजे. जसे जसे मी नागरिकांशी संवाद साधत होतो. त्या त्या वेळी नागरिक माझ्याकडे हीच मागणी करत होते. नागरिकांचे अनेक प्रश्न आहेत. ज्या प्रश्नांची सोडवणूक मी करू शकतो असे नागरिकांना वाटत होते. त्यामुळे त्यांच्याकडून अशी अपेक्षा व्यक्त होणे साहजिक होते. पुढे जाऊन कार्यकर्त्यांकडूनही अशी मागणी होऊ लागली की, आता आपण पुढे गेले पाहिजे. गेली दहा वर्ष मी पक्षाचे काम करत आहे. पक्षाची ध्येयधोरणे, योजना तळागाळात पोहोचवण्यासाठी जीवाचे रान केले आहे. हे पक्षाला देखील माहित आहे l.जोपर्यंत मी नेत्यांचे काम करत होतो. त्यांच्या मागेपुढे करत होतो. तोपर्यंत माझ्याबद्दल त्यांना कुठलाही आकस नव्हता. पण ज्यावेळी नागरिकांची मागणी, कार्यकर्त्यांचा रेटा वाढू लागला. अशावेळी नागरिकांना बांधील राहून मी विधानसभेच्या निवडणुकीसाठी इच्छा व्यक्त केली. जसा मी इच्छुक झालो. तसा माझ्याबद्दल नेत्यांना आकस वाढला. माझ्या कार्यक्रमांना पक्षाच्या नेत्यांनी येणे टाळले. कार्यकर्त्यांनाही माझ्या कार्यक्रमांना उपस्थित राहू नये अशा धमक्या देण्यात येऊ लागल्या. याही पुढे जाऊन मला पक्षातून काढून टाकण्याची धमकी दिली. पक्षावर माझा विश्वास आहे. परंतु नेत्यांना जर त्यांचा स्वार्थ कळत असेल तर एखाद्या कार्यकर्त्यांनी स्वार्थी झाले तर त्याच्याबद्दल लगेच कारवाई पक्ष करणार का असा माझा सवाल आहे.

बालवडकर पुढे म्हणाले की आजच्या कार्यक्रमातून मी पक्षाला फक्त एवढेच सांगत आहे की, अजूनही वेळ गेलेली नाही.पक्षाने माझा विचार करावा मी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कोथरूड मतदार संघातून इच्छुक असून पक्षाने जर मला उमेदवारी नाही दिली तर मग मला वेगळा विचार या जनतेसाठी घ्यावा लागणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

………

*जनता जनार्दन पाठीशी; मला भीती कोणाची*

अमोल बालवडकर म्हणाले पाच सहा महिन्यापूर्वी माझ्या मनात देखील नव्हते की मला आमदारकीच्या निवडणुकीला सामोरे जायचे आहे. मात्र जनतेने माझ्या मनात हे बीज पेरले आहे. जनतेचा पाठिंबा मला मिळत आहे. जनता जनार्दन माझ्या पाठीशी असताना मला कोणाच्या धमकीला घाबरायची गरज नाही. मला त्यामुळे काही फरकही पडत नाही. जनता माझी पाठीराखी आहे. त्यामुळे माझे कोणीच वाकडे करू शकत नाही.

………..

बालवडकर यांच्या शक्ती प्रदर्शनाची चर्चा
कार्यक्रमाला कोणीही येत नाही म्हणून अमोल बालवडकर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून मतदार संघातील घरकाम करणारे,वडापाव विकणारे,कामगार,कष्टकरी,तसेच महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना थेट स्टेजवर बोलावून त्यांचा सन्मान केला. मतदार संघातील नागरिक हेच माझे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आहेत असेही बालवडकर यावेळी म्हणाले. बालवडकर यांनी मेळाव्यासाठी जमवलेली गर्दी आणि नागरिकांचा मेळाव्याला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद याची चर्चा मात्र कोथरूड परिसरामध्ये चांगलीच रंगली आहे.
…….