February 9, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

परीक्षा पे चर्चा २०२६ उपक्रमाची पेरिविंकलच्या सर्व शाखांमध्ये उत्स्फूर्त व यशस्वी अंमलबजावणी!!!

बावधन :

चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरीविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या इयत्ता १० वी व १२वी च्या विद्यार्थ्यांसाठी “परीक्षा पे चर्चा” मध्ये भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींजी यांच्याशी चर्चासत्राचे संवाद साधताना थेट प्रक्षेपणाचे १० वाजता खास आयोजन करण्यात आले.

विद्यार्थ्यांमध्ये वाढणारा परीक्षा तणाव कमी करून त्यांच्यात आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन, मानसिक संतुलन व सर्वांगीण विकास घडवून आणण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयातर्फे आयोजित ‘परीक्षा पे चर्चा २०२६’ हा महत्त्वपूर्ण राष्ट्रीय उपक्रम पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या बावधन , सूस, पिरंगुट पौड सह सर्व शाखांमध्ये अत्यंत नियोजनबद्ध, शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे राबविण्यात आला.

हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरणारा असून, परीक्षेकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक बनविण्यासाठी तो महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

दि. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता देशाचे माननीय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांनी देशभरातील विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या शंका, भीती व अपेक्षा यांवर मोकळेपणाने विचार मांडले. या संवादाचे थेट प्रक्षेपण पेरिविंकलच्या सर्व शाखांमध्ये मोठ्या पडद्यावर एकाच वेळी दाखविण्यात आले. विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी संपूर्ण वेळ अत्यंत लक्षपूर्वक पंतप्रधानांचे विचार ऐकले. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत परीक्षेकडे तणावाने न पाहता आत्मविश्वासाने व आनंदाने सामोरे जाण्याचा संदेश दिला.

या संवादात पंतप्रधानांनी अभ्यासाचे योग्य नियोजन, वेळेचे व्यवस्थापन, तणावमुक्त जीवनशैली, आरोग्याची काळजी, कुटुंब व शिक्षकांची भूमिका, अपयशातून शिकण्याची सवय तसेच स्वतःवर विश्वास ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. परीक्षांना जीवनाचा शेवटचा टप्पा न मानता त्या शिकण्याच्या प्रक्रियेचा एक भाग आहेत, हे त्यांनी सोप्या शब्दांत विद्यार्थ्यांना पटवून दिले.

या उपक्रमाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राजेंद्र बांदल सर यांनी सांगितले की, “‘परीक्षा पे चर्चा’ हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी केवळ एक शैक्षणिक कार्यक्रम नसून तो त्यांच्या जीवनाला दिशा देणारा, आत्मविश्वास वाढविणारा व मानसिकदृष्ट्या सक्षम बनविणारा संवाद आहे. परीक्षेकडे भीतीने नव्हे तर सकारात्मकतेने आणि आत्मविश्वासाने पाहण्याची दृष्टी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत प्रभावी ठरतो. माननीय पंतप्रधानांनी दिलेले मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या मनातील तणाव दूर करून त्यांना ध्येयाकडे ठामपणे व निर्धाराने वाटचाल करण्याची प्रेरणा देते.”

कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढलेला दिसून आला. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, परीक्षेबाबतची भीती कमी झाली असून अभ्यासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक झाला आहे. शिक्षकांनीही या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या मानसिक व भावनिक विकासासाठी अशा संवादात्मक उपक्रमांची नितांत गरज असल्याचे मत व्यक्त केले.

पालकवर्गानेही या उपक्रमाचे स्वागत करत सांगितले की, परीक्षा काळात मुलांवर येणारा ताण कमी करण्यासाठी आणि त्यांना भावनिक आधार देण्यासाठी ‘परीक्षा पे चर्चा’सारखे उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरतात.

पेरिविंकल शिक्षणसंस्थेने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्यांच्या मानसिक स्वास्थ्याला तितकेच महत्त्व दिले असून, अशा राष्ट्रीय उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेची असलेली बांधिलकी या उपक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाली. 

या संपूर्ण थेट प्रक्षेपणाचे आयोजन पेरीविंकल शाळेच्या संचालिका सौ रेखा बांदल, शिवानी बांदल आणि मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.