February 4, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर-बालेवाडीत सुरळीत व वेळेत पाणीपुरवठ्यासाठी समीर चांदेरे यांचा पुढाकार

बाणेर :

बाणेर-बालेवाडी परिसरातील नागरिकांना अनेक वर्षांपासून भेडसावत असलेला अपुरा व अनियमित पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत व वेळेत होणार असून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

पूर्वी बाणेर टेकडीवरील दोन टाक्या, पॅनकार्ड क्लबजवळील एक, मोहननगरजवळील आणि कलमाडी हाऊसजवळील समान पाणीपुरवठा प्रकल्पातील टाक्यांमधून संपूर्ण बाणेर परिसरात पाणी सोडले जात होते. त्यामुळे अपुरा पाणीपुरवठा आणि कमी वेळेचा टायमिंग ही समस्या गंभीर होत चालली होती.

आता या पाच टाक्यांच्या माध्यमातून बाणेर परिसराचे पाच स्वतंत्र भाग करण्यात आले आहेत. प्रत्येक भागाला संबंधित टाकीतून थेट पाणीपुरवठा केला जाणार असून, त्यामुळे सर्व भागांमध्ये पुरेसा आणि वेळेवर पाणी मिळणार आहे.

बालेवाडीतही समान पाणीपुरवठा प्रकल्पांतर्गत दोन नवीन टाक्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. दोन टप्प्यांत सुरू झालेल्या या योजनेंतर्गत बालेवाडी गावाला नियमित पाणीपुरवठा सुरू झाला आहे.

या निर्णयासंदर्भात माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांनी कनिष्ठ अभियंता सतीश शिंदे, सहाय्यक अभियंता नरेश रायकर तसेच एल अँड टीचे अभियंता प्रतिक गरज यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली.

युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, पुणे शहर समीर चांदेरे यांनी सांगितले की, “बाणेर-बालेवाडीतील नागरिकांच्या पाणीपुरवठ्याच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. नागरिकांना वेळेत आणि पुरेशा प्रमाणात पाणी मिळणे हीच आमची प्रामाणिक बांधिलकी आहे.”