बालेवाडी :
बालेवाडी आणि साई चौकातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून तातडीने हे रस्ते दुरुस्त करण्यात यावे या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष श्री. राहुल उत्तम बालवडकर यांनी औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयात सहाय्यक आयुक्त गिरीश धापकेकर यांना निवेदन दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, सध्या पावसाळ्यामुळे रस्त्यांची परिस्थिती अत्यंत खराब झाली आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे आणि धोकादायक खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांना गंभीर दुखापती होत असून, अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेक वाहनांना अचानक ब्रेक मारावा लागत असल्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे.
या समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून, वाहनांचे नुकसान आणि अधिक भार पडत आहे. तसेच, वाहतूक कोंडी आणि विलंब होत आहे. विशेष म्हणजे खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे त्यांची खोली दिसत नाही, त्यामुळे अपघाताचा धोका आणखी वाढला आहे.
या संदर्भात बालेवाडी परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत, मात्र तरीही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे, नागरिकांचे नेतृत्व करणारे श्री. राहुल उत्तम बालवडकर यांनी महानगरपालिकेला या समस्येची दखल घेऊन तातडीने रस्त्यांची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, अशी विनंती केली आहे. या निवेदनामुळे तरी प्रशासनाला जाग येईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.


More Stories
“उच्च तंत्र की तंत्रमंत्र? अमोल बालवडकरांचा भोंदू खरात सोबत फोटो वरून चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा”
औंध ग्रामदैवत भैरवनाथ महाराज उत्सव ३ मे रोजी; ग्रामसभेत तारीख जाहीर
लहानग्यांच्या स्वप्नांना मिळाले पंख: पेरिविंकल पिरंगुटमध्ये सीनियर केजी ग्रॅज्युएशन डे जल्लोषात साजरा!!!