June 3, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

म्हाळुंगे टीपी स्कीमसाठी अमोल बालवडकर यांचे मुख्यमंत्री यांना निवेदन; प्रलंबित प्रकल्पाला गती देण्याची मागणी..

मुंबई :

अनेक वर्षापासून प्रलंबित म्हाळुंगे टीपी (Town Planning) स्कीमला लवकरात लवकर अंतिम मान्यता मिळावी व प्रलंबित विकासकामांना गती मिळावी, या मागणीसाठी माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेऊन निवेदन सादर केले.

मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरु झालेला म्हाळुंगे टीपी स्किम हा प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या योजनेस स्थानिक शेतकरी व नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद असून, त्यांनी या योजनेला आपली मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरात लवकर या योजनेचा आराखडा तयार होऊन अंतिम मान्यता मिळावी अशी विनंती पत्राद्वारे मुख्यमंत्री महोदयांना अमोल बालवडकर यांनी केली आहे.

पीएमआरडीएच्या माध्यमातून या योजनेवर गेल्या काही वर्षांपासून काम सुरु असून देखील, अजूनही तांत्रिक अडचणींच्या कारणास्तव अंतिम मान्यता मिळालेली नाही. परिणामी, या परिसरातील अपेक्षित विकासकामांना गती मिळालेली नाही.

या पार्श्वभूमीवर अमोल बालवडकर यांनी मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे विनंती केली आहे की, सदर टीपी स्किमसाठी लागणाऱ्या सर्व तांत्रिक अडचणी दूर करून तात्काळ अंतिम मान्यता द्यावी, जेणेकरून लवकरात लवकर या भागातील मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा व इतर विकासकामांना गती मिळेल.

या योजनेची अंमलबजावणी झाल्यास संपूर्ण परिसराचा चेहरामोहरा बदलून सामाजिक व आर्थिक विकासाला देखील चालना मिळेल, त्यामुळे सदरील प्रकल्प मार्गी लागणे महत्वाचे आहे, असा विश्वास या पत्राद्वारे बालवडकर यांनी व्यक्त केला आहे.