June 4, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या १४२व्या जयंतीनिमित्त ‘हर घर सावरकर’ उपक्रमात प्रेरणादायी व्याख्यानास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

बाणेर :

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४२व्या जयंतीनिमित्त त्यांचं देशासाठीचं अमूल्य योगदान आणि क्रांतिकारी विचारांचा जागर करण्याच्या हेतूनं, बाणेर येथील बंटारा भवनमध्ये ‘हर घर सावरकर’ या उपक्रमांतर्गत एक प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आलं.

हा कार्यक्रम कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील, लहू बालवडकर सोशल वेलफेअर, ब्राह्मण सांस्कृतिक संघ, बाणेर, आणि ‘हर घर सावरकर समिती, महाराष्ट्र राज्य’ यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात अग्रणी साठे यांच्या सावरकरांवरील कीर्तनाने झाली. त्यांच्या सुरेल आणि अर्थपूर्ण प्रस्तुतीमुळे सभागृहात राष्ट्रभक्तीचा स्फुरण चढला. या कार्यक्रमात श्रीमंत बाजीराव पेशवा सैनिक शाळेचे माजी अधिकारी श्री आबा कांबळे (आडेगाव, मोहोळ) यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

प्रमुख वक्ते श्री. अविनाश धर्माधिकारी यांनी आपल्या अभ्यासपूर्ण आणि झंझावात शैलीतील व्याख्यानातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व, त्यांचे लेखन, विचारधारा, आणि देशासाठी दिलेलं बलिदान या सर्व पैलूंचा सखोल वेध घेतला. त्यांनी आपल्या भाषणात वक्फ कायदे, पहलगाम हल्ला, समान नागरी संहिता, द न्यू नॉर्मल, आणि राष्ट्रीय सुरक्षा धोरणांवर मार्मिक विचार मांडले.

“पाकिस्तानच्या अण्वस्त्रधमकींना भीक न घालता भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ सारख्या कार्यवाहीतून आपली सामरिक ताकद सिद्ध केली, असे नमूद करत त्यांनी सावरकरांचा दृष्टिकोन आजही किती सुसंगत आणि कालातीत आहे हे अधोरेखित केले.

कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांनी विशेष उपस्थिती लावली सोबत माजी नगरसेविका ज्योती ताई कळमकर व स्वप्नाली ताई सायकर त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाचा गौरव वाढला.

तसेच कार्यक्रमास “हर घर सावरकर” समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष श्री. देववरत बापट, ब्राह्मण सांस्कृतिक संघाचे पदाधिकारी सौ. उमा गाडगीळ, सौ. अस्मिता कारंदीकर, श्री. गिरीश देशपांडे, आणि लहू बालवडकर सोशल वेलफेअरचे प्रमुख श्री. लहू बालवडकर सर्वांनी मिळून कार्यक्रमाचे आयोजन केले

सौ. अदिती करमबळकर आणि सौ. शिल्पा देशपांडे यांनी अत्यंत उत्तम आणि समर्पक सूत्रसंचालन करत कार्यक्रमाची सुसंवादात सांगता केली.

या व्याख्यानाच्या निमित्ताने उपस्थित नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना बळकट झाली, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांची नव्या पिढीपर्यंत पोचण्याची गरज अधोरेखित झाली. इतिहासाचा योग्य परिप्रेक्ष्यात अभ्यास आणि राष्ट्रासाठी योगदान देण्याचा संकल्प यामुळे अनेकांनी या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला.

कार्यक्रमानंतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले की, “हा केवळ एक व्याख्यान नव्हतं, तर एक वैचारिक जागृती होती.”