February 4, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

प्रभाग ९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा विजयाचा निर्धार, भव्य कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न, अप्पा-भैय्या जोडीच विकासाच वादळ सुरू..

बाणेर :

प्रभाग क्रमांक ९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित भव्य कार्यकर्ता मेळाव्यास कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, सुस व म्हाळुंगे परिसरातील असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या मेळाव्यात प्रभाग क्रमांक ९ साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार
गायत्री मेढे–कोकाटे (अ गट), बाबुराव चांदेरे (ब गट), पार्वती निम्हण (क गट) आणि अमोल बालवडकर (ड गट)
यांच्या नेतृत्वाखाली आगामी महापालिका निवडणूक विकासाच्या बळावर अधिक ताकदीने लढवण्याचा ठाम संकल्प करण्यात आला.

मेळाव्यात प्रभागातील मूलभूत प्रश्न, आतापर्यंत झालेला विकास, भविष्यातील विकासाची स्पष्ट दिशा आणि जनतेशी थेट संवाद यावर सखोल चर्चा झाली. चारही अधिकृत उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून एकजुटीने, शिस्तबद्ध आणि आक्रमक पद्धतीने प्रचार करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत होता.

हा मेळावा केवळ बैठक नव्हता, तर प्रभाग क्रमांक ९ मधील बदलाची ठोस सुरुवात होती. कार्यकर्त्यांची ताकद, जनतेचा विश्वास आणि विकासाची भक्कम कामगिरी याच बळावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रभागात विजयाची नवी व मजबूत कथा लिहिणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

यावेळी बाणेर–बालेवाडी परिसरातील दोन विकासपुरुष एकत्र आल्याने मेळाव्यात जोरदार फटकेबाजी ऐकायला मिळाली. भाजप पक्षातील पुण्यातील काही नेत्यांनी केलेल्या अन्यायाविरोधात माजी नगरसेवक अमोल बालवडकर हे प्रचंड आक्रमक झाले.

“भाजपने मला संपवण्याचा कट रचला होता. मात्र अजितदादांनी मला राजकारणात पुनर्जन्म दिला. आता माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे चारही उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून आणून ४–० चे विजयी समीकरण पूर्ण केल्याशिवाय थांबणार नाही,” असे ठाम प्रतिपादन अमोल बालवडकर यांनी केले.

मार्गदर्शन करताना माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे म्हणाले, “अमोल आणि मी वेगवेगळ्या पक्षांत असताना विकासकामांसाठी लढत होतो. आज आम्ही एकत्र आलो असून नागरिकांच्या समस्या अधिक ताकदीने सोडवणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचे चारही उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येतील.”

प्रचार प्रमुख सुनील चांदेरे यांनी सांगितले की,
“राष्ट्रवादी काँग्रेसचे चारही उमेदवार सक्षम आहेत. बाबुराव आप्पा आणि अमोल भय्या एकत्र आल्याने विरोधकांमध्ये लढण्याची ताकद उरणार नाही.”