February 5, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बालेवाडी येथील भाजी मार्केट सुरू करण्यासाठी जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आंदोलन

पुण्याच्या सत्ताधाऱ्यांनी “स्मार्ट सिटी” ऐवजी “स्क्रॅप सिटी” केली – जयेश मुरकुटे

बालेवाडी (दि. 30 ऑक्टोबर) :

स्मार्ट सिटी अंतर्गत सुमारे एक कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेले साई चौक, बालेवाडी येथील भाजी मार्केट अद्याप नागरिकांसाठी खुलं करण्यात आलेलं नाही. त्यामुळे परिसरातील नागरिक, पथारी विक्रेते आणि लायसन्सधारक भाजी विक्रेत्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या अन्यायकारक स्थितीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) तसेच जयेश सोशल फाउंडेशन यांच्या वतीने भाजी मार्केट सुरू करण्यासाठी आज आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाचे नेतृत्व कोथरूड विधानसभेचे कार्याध्यक्ष जयेश मुरकुटे यांनी केले. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर तीव्र शब्दांत टीका करताना म्हटले, “पुण्याच्या सत्ताधाऱ्यांनी पुण्याची ‘स्मार्ट सिटी’ करण्याऐवजी ‘स्क्रॅप सिटी’ केली आहे. कोट्यवधींचा खर्च करून उभारलेली सोय नागरिकांच्या उपयोगात न आणणे म्हणजे करदात्यांचा अपमान आहे.”

यादरम्यान भाजी मार्केटच्या परिसरात प्रतिकात्मक भाजी विक्री करून निषेध नोंदविण्यात आला. तसेच पुणे महानगरपालिकेविरुद्ध घोषणाबाजी करून, तातडीने भाजी मार्केट सुरू करण्याची मागणी करण्यात आली.
आंदोलनकर्त्यांनी पुढील मागण्या मांडल्या –
1. साई चौक, बालेवाडी येथील भाजी मार्केट तातडीने नागरिकांसाठी सुरू करावी.
2. लायसन्सधारक व स्थानिक भाजी विक्रेत्यांना गाळे वाटप करण्यात यावेत.
3. रिकामी व बंद मंडईची जागा मद्यपींकडून वापरली जात असल्याने तिथे स्वच्छता व सुरक्षा व्यवस्था करण्यात यावी.

त्याचप्रमाणे तातडीने याभाजी मार्केट बरोबरच बाणेर आणि सुतारवाडी येथील भाजी मंडई ही लवकर सुरू करण्यात यावी, अन्यथा स्थानिक नागरिक आणि विक्रेत्यांसह मोठे आंदोलन करण्यात येईल, याची संपूर्ण जबाबदारी महापालिकेवर राहील, असा गंभीर इशाराही जयेश मुरकुटे यांनी दिला.

यावेळी आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहर उपाध्यक्ष संदीप बालवडकर, ज्योती चांदेरे, संतोष तोंडे, काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस जीवन चाकणकर, महेश सुतार, मधुसूदन पाडाळे, संजय मुरकुटे, रितेश पाडाळे, तुषार हगवणे, सारंग कोळेकर, राजेश बालवडकर, सुरज बालवडकर, पंकज खताने, महेश शिवशरण, आनंद पदीले, रामानंद सर, विलास पाटील, क्षीरसागर सर, नितीन वैराळ, कृष्णा थिटे, घावटे जी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.