July 6, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर–बालेवाडीमध्ये आपत्कालीन परिस्थिती; आपत्ती व्यवस्थापन कक्ष तातडीने सुरू करण्याची काँग्रेसची मागणी

बाणेर, दि. ६ जुलै :

गेल्या ४८ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बाणेर–बालेवाडी परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली असून काही मार्ग बंद पडले आहेत. नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर औंध क्षेत्रीय कार्यालयांतर्गत आपत्ती व्यवस्थापन कक्ष तातडीने सुरू करून नागरिकांना आवश्यक मदत, बचाव व समन्वय सेवा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी काँग्रेसचे पदाधिकारी श्री. जीवन चाकणकर यांनी केली आहे.

याबाबत श्री. चाकणकर यांनी औंध क्षेत्रीय कार्यालयाचे आयुक्त श्री. विजय नायकल यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. तसेच पाणी साचलेल्या भागांची तातडीने पाहणी करून पाणी उपसण्याची व्यवस्था, रस्ते वाहतुकीसाठी खुले करणे, आपत्कालीन यंत्रणा सतर्क ठेवणे आणि नागरिकांना त्वरित मदत उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली.

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने युद्धपातळीवर उपाययोजना राबवून कोणतीही जीवित किंवा वित्तहानी होणार नाही यासाठी तात्काळ पावले उचलावीत, असे आवाहनही श्री. जीवन चाकणकर यांनी केले.