June 19, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

“वीज सडक पाणी” प्रश्न, बालेवाडी वेलफेअर फेडरेशनने मांडला महाराष्ट्राच्या मंत्रालयात.

पुणे :

बाणेर-बालेवाडी भागात भेडसवणाऱ्या तीन प्रमुख मूलभूत समस्या “वीज, सडक आणि पाणी” साठी बालेवाडी वेलफेअर फेडरेशन लोकप्रतिनिधि आणि प्रशासन दोन्ही पातळीवर सतत पाठपुरावा करत आहे.

वारंवार वीज जाणे आणि त्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रास हे बाणेर-बालेवाडीतील नागरिकांना नवीन नाही. त्यासाठी स्वतंत्र सब-स्टेशन आवश्यक आहे. २०२४ मध्ये बालेवाडी फेडरेशनच्या पाठपुराव्याने सब-स्टेशन साठी बालेवाडी मध्ये जागा मिळाली आहे. परंतु गेले दोन वर्षे या जागेवर सब-स्टेशन उभारण्यासाठी कोणतीही हालचाल नव्हती. येथे लवकरात लवकर काम सुरू करावे म्हणून फेडरेशनने महावितरण आणि महापारेषणच्या अधिकारी वर्गाकडे सतत विचरणा केली. लोकप्रतिनिधींकडे देखील मागणी केली. परंतु प्रश्न सुटत नव्हता.

२०२३ मध्ये पाण्यासाठी फेडरेशनच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी आंदोलन केल्याने ३.८ किलोमीटर पाईपलाईनचे काम पुर होऊन पाणी प्रश्न काहीसा सुटला. परंतु अजूनही बाराही महीने अनेक सोसायटी टँकरचे पाणी विकत घेतात. नवीन होणाऱ्या गगनचुंबी इमारतींमुळे नजीकच्या भविष्यात येथील लोकसंख्या ३५ ते ४० हजाराने वाढणार आहे. त्याला कसे पाणी पुरविणार या बद्दल प्रश्न फेडरेशन तर्फे विभागीय आयुक्त व पुणे महापालिका सभेत विचारले आहेत. यावर समाधानकारक उत्तर मिळत नाही.

बाणेर-बालेवाडी येथील अपुरे रस्ते हा अनेक वर्षांपासून रखडलेला प्रश्न. भूमी अधिग्रहण अभावी हे रस्ते अर्धवट आहेत. यावर उच्च पातळीवर धोरणात्मक निर्णय होणे गरजेचे आहे.

“वीज सडक पाणी” हे मूलभूत प्रश्न स्थानिक पातळीवरील प्रशासन आणि लोकप्रतिनिधि सोडवू शकत नसल्याने बालेवाडी वेलफेअर फेडरेशन तर्फे निर्णय घेण्यात आला की मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री आणि नगरविकास खात्याच्या राज्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणे गरजेचे आहे.

त्याप्रमाणे मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क करण्यात आला असून वास्तुस्थितीची कल्पना त्यांना देण्यात आली आहे. लवकरच मा. मुख्यमंत्री साहेबांची भेट फेडरेशनच्या प्रतिनिधींना मिळणार आहे. मा. उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचेकडे समस्या मांडली असून त्यांचेकडून कारवाई सुरू झाली आहे.

मा. माधुरीताई मिसाळ, नगरविकास राज्यमंत्री यांना भेटून त्यांना समस्येविषयी माहिती दिली. त्यांनी हे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले आहे.

महापौर मा. मंजूषाताई नागपुरे यांना देखील भेटून मूलभूत समस्येबाबत विस्तृत माहिती दिली. त्यांनी यात कक्ष घातले आहे.

फेडरेशन तर्फे मोरेश्वर बालवडकर, शकील सलाती, सचिन पाटील,दफेदार सिंह,आशिष कोटमकर, सुनील गाळणकर आणि रमेश रोकडे यांनी सर्व पातळीवर भेटीगाठी घेऊन प्रश्न महाराष्ट्राच्या मंत्रालयात प्रश्न मांडला आहे.